पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात झपाट्याने वाढ
धुळे │ जोरदार पावसाचा फटका आता थेट भाजीपाल्याच्या बाजारात जाणवू लागला आहे. महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, भाजीपाल्याची आवक घटली असून दर गगनाला पोहोचले आहेत.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टमाट्याच्या २० किलोच्या कॅरेटचा दर तब्बल ७५० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतातील टमाटे, कोथिंबीर, वांगी, मिरची, बटाटा आणि कांदा यांसारख्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
बाजारात भाजीपाल्याची आवक कमी असून मागणी मात्र वाढलेली असल्याने दर वाढले आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांतही दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.
दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. तर दुसरीकडे, शेतकरी वर्गही पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडला आहे.

