भारतीय बौद्ध महासभेचे जनआक्रोश आंदोलन
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली विविध बौद्ध व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत जनआक्रोश आंदोलन छेडले. या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यामध्ये, 1949 चा घटनाबाह्य बोधगया मंदिर अधिनियम रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवावे, अशी पहिली मागणी करण्यात आली. दुसरी मागणी म्हणून, मध्यप्रदेशातील महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळावरील स्मारकाचे व्यवस्थापन ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’कडे हस्तांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली. सध्याचे व्यवस्थापन विचारधारेच्या विरोधात चालत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
तर तिसऱ्या मागणीत नागपूर येथील दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवून तिचे पावित्र्य जपावे आणि व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पालन करणाऱ्या अधिकृत संस्थांकडे सोपवावे, अशी मागणी झाली.
या आंदोलनाद्वारे बौद्ध समाजाच्या भावना व श्रद्धास्थळांवरील अन्यायकारक व्यवस्थापनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला.

