शहरातील अव्यवस्थांवर आ.अनुप अग्रवाल आक्रमक – नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासमोर मांडले धुळ्याचे खरे चित्र

धुळे शहरातील वाढती अव्यवस्था, जनावरांची अवैध कत्तल, मांस विक्री, अतिक्रमणांचा विळखा आणि नशेच्या औषधांचा काळाबाजार यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची ३ जून रोजी औपचारिक भेट घेतली. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी शहराच्या वास्तव परिस्थितीचा सविस्तर आढावा सादर करत कठोर आणि ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त केली.

या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, धुळे शहरात वर्षभर गोवंश कत्तलीचे प्रकार घडत असून, विशिष्ट भाग ‘हॉटस्पॉट’ बनले आहेत. उघड्यावर मांस विक्री, नाल्यांमध्ये फेकले जाणारे अवशेष, आणि परवानाधारक नसलेल्या व्यक्तींनी सुरू ठेवलेली विक्री ही गंभीर समस्या बनली आहे. यावर महापालिकेने विशेष पथक तयार करून कठोर कारवाई करावी, अशी त्यांची ठाम मागणी होती. महापालिकेच्या आणि अन्य शासकीय जमिनींवरील वाढत्या अतिक्रमणांचा पाढा मांडताना त्यांनी गट क्र. ५१० मधील अनधिकृत दर्ग्याचे उदाहरण दिले आणि ‘लँड जिहाद’सारख्या प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन केले. या जागेवर प्रस्तावित थीम पार्कसाठी अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, असेसुद्धा त्यांनी सुचवले. याबरोबरच धुळे शहर व जिल्ह्यातील १७ शांतता समित्या केवळ नावापुरत्याच उरल्या असून, त्या नव्याने गठीत करताना तरुण, सक्रिय आणि जबाबदार व्यक्तींना संधी द्यावी, नशेच्या औषधांचा काळा बाजार आणि त्यामागील साखळीवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

धुळेहून सुमारे १० हजार कोटींच्या वस्तूंची निर्यात होते. जर येथेच ड्रायपोर्टची सुविधा निर्माण केली गेली, तर वेळ आणि खर्चात मोठी बचत होईल, असे सांगून त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे आवाहन केले. शेती व पशुसंवर्धन क्षेत्रातील गैरव्यवहारही अग्रवाल यांनी उघड केला. ईअर टॅगशिवाय जनावरांची विक्री, बनावट दाखले, आणि यंत्रणेतील भ्रष्टाचार यावर कठोर कारवाईसह आवश्यक पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या बैठकीत शहराच्या व जिल्ह्याच्या अनेक तातडीच्या समस्यांवर चर्चा झाली असून, नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले. आगामी काळात प्रशासनाकडून ठोस कृतीची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त करुणा डहाळे, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top