धुळे तालुक्यातील जुने भदाणे गावाजवळून जाणाऱ्या ऐतिहासिक रायवट पाटाची साफसफाई ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व नेर गटाचे नेते शंकरराव खलाणे यांच्या हस्ते झाला. पाटाचे स्वरूप व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेल्या या रायवट पाटामार्गे पांझरा नदीचे पाणी नेर व परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे या पाटाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पाटात गावातील सांडपाणी, घाण कचरा, झाडेझुडपे आणि शेवाळ साचल्याने दुर्गंधी आणि पाण्याशी संबंधित रोगांचा त्रास ग्रामस्थांना होत होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने ठराव करून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाटाच्या संपूर्ण स्वच्छतेस मंजुरी दिली असून, कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या पाटालगतच जुने भदाणे गावाची वस्ती असल्याने स्वच्छतेचे काम आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे.
यासोबतच, रायवट पाटाची सिमेंट पाइपद्वारे दुरुस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव आमदार राम भदाणे यांनी पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे. मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शुभारंभप्रसंगी सरपंच भीमा कर्णर, उपसरपंच विठ्ठल पाटील, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, कांतीलाल भिल, मोहन भिल, रवींद्र वाघ, विलास खलाणे, पिंटू बाचकर, दीपक पाटील, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वच्छता उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून भविष्यातील आरोग्यविषयक धोके टळणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी तुषार देवरे, देऊर

