नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील शेतकरी व ग्रामस्थ गेले काही महिने खंडित वीजपुरवठा, भारनियमन आणि वारंवार बिघाडांमुळे त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होतो असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या शेतीला बसत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
गावातील वीजपुरवठा सध्या सुंदरदे येथून होत आहे, कारण अवकाळी पावसामुळे काही दिवसांपूर्वी वीजेचे खांब कोसळले होते. त्यातच विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) वारंवार जळत असल्याचे प्रकार घडत असून मागील १५ ते २० दिवसांत असे अनेक वेळा झाले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा अजूनच विस्कळीत झाला आहे.
याबाबत शंभरहून अधिक ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली. मात्र, कार्यकारी अभियंता मिटिंगमध्ये असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत कैफियत मांडली.
सामाजिक कार्यकर्ते अंबालाल सखाराम चौधरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, करजकुपा ग्रामस्थांनी पातोंडा सब स्टेशनवरून कायमस्वरूपी वीजतारा जोडण्याची मागणी केली आहे. या भागातील समस्या वाढत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
