माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केलेल्या ‘हिंदू दहशतवाद’ या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधानामुळे संपूर्ण सनातन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत धुळ्यात शिवसेनेच्या युवासेनेने जोरदार आंदोलन केलं.
हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी युवासेना कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्याविरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला.
“सनातन धर्म हा आमचा स्वाभिमान आहे. हा भगवा शिवरायांचा, वारकऱ्यांचा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला.
युवासेनेने असा देखील आरोप केला की, काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासूनच सनातन धर्माचा अपमान करत आहे. ते वेळोवेळी फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत व ‘वोट बँकेच्या’ राजकारणासाठी हिंदू धर्माला बदनाम करत आहेत.
युवासेनेने अधिक आक्रमक भूमिका घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी जर इस्लाम धर्मावर प्रेम असेल, तर त्यांनी स्वतःचे नाव ‘पृथ्वीराज चव्हाण’ ऐवजी ‘मोहम्मद घोरी’ करून स्वतःची सुन्नत करून घ्यावी, असा टीकेचा घणाघात देखील केला.
या आंदोलनात युवासेना महानगरप्रमुख योगेश भैय्या मराठे, अमित खंडेलवाल, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख (धुळे लोकसभा) प्रसाद महाले, शुभम पाटील, कल्पेश चौधरी, चेतन धमेचा, देवा गायकवाड, नितीन धनगर, वेदांत करणे, प्रविण मराठे, सागर धिवरे, अनिल ठाकूर, आकाश पाटील, नितीन मराठे, प्रतीक शिंदे, सागर पाटील यांच्यासह युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

