शिरपूर (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील जळोद येथील आदिवासी आश्रम शाळेच्या स्थलांतराच्या विरोधात आदिवासी बांधवांनी आज आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. हा मोर्चा विशेष म्हणजे आदिवासी क्रांती दिनाच्याच दिवशी काढण्यात आला.
ग्रामस्थांनी आरोप केला की, जळोद येथील आश्रमशाळेचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी संगनमत करून पेसा अंतर्गत असलेली शाळा नॉन पेसा करून शासनाची दिशाभूल केली. तसेच शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला.
याशिवाय, शासनाला खोटी कागदपत्रे सादर करून जळोद येथील शाळा भामपूर येथे स्थलांतरित असल्याचे दाखवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकारामुळे स्थानिक आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलकांनी शाळेचे स्थलांतर तात्काळ थांबवावे, तसेच संस्थाचालक आणि मुख्याध्यापकावर फसवणूक व गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी केली.

