धुळे : धुळे शहरातील देवपूर विभागातील नगावबारी परिसरात असलेल्या एमबीआर जलकुंभाच्या व्हॉल्वला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरात सध्या चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत असल्याची टीका केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या जलकुंभाच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे वारंवार पाण्याची नासाडी होत असून प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

