शिंदखेडा, धुळे —अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज शिंदखेडा येथे शिवसेना (उबाठा गट)च्या वतीने भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शिंदखेडा चौफुलीपासून सुरू झालेल्या या मोर्चात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान “शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे!, प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे!, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख हेमंत साळुंखे आणि उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केले. आंदोलनानंतर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या धरून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की, जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही, तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

