निजामपूर परिसरात बनावट कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर कृषी विभाग आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गुप्त बातमीच्या आधारे आखाडे फाट्याजवळ करण्यात आली. बनावट बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने धाडसी निर्णय घेत शेतकरीहितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कृषी विभागाचे बियाणे निरीक्षक अरुण तायडे आणि प्रभारी अधिकारी मयूर भामरे (सहायक पोलीस निरीक्षक, निजामपूर पोलीस स्टेशन) यांना खबर मिळाली होती की, विलास तोताराम पाटील (रा. बायद, ता. जि. नंदुरबार) हे स्विफ्ट गाडी (MH 18 BG 3328) मधून आखाडे फाट्याजवळ बनावट कापूस बियाण्यांची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याअनुषंगाने आखाडे फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिला असता, चालकाने गाडी वेगात चालवत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. तपासणीदरम्यान गाडीतून दोन पोत्यांमध्ये ७५ हजार रुपयांचे HTBT बनावट कापूस बियाणे आढळून आले.
या कारवाईत विलास तोताराम पाटील आणि शाम वसंत देवरे (रा. कले-पळसोळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) या दोघांविरुद्ध निजामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकात कृषी निरीक्षक अरुण तायडे, कल्याण पाटील (गुणनियंत्रण निरीक्षक), पोलीस निरीक्षक प्रदीप सोनवणे, उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड, मधुकर सोमासे, तसेच विविध पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.