धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वेळीच आणि संवेदनशीलतेने केलेल्या कृतीमुळे एका तरुणाचा जीव वाचल्याची घटना काल १० जून रोजी रात्री घडली. घरात झालेल्या छोट्याशा वादामुळे आत्महत्येच्या विचाराने घराबाहेर पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वेळेवर शोधून काढले आणि त्याचा जीव वाचवला.
आमीन पिंजारी नावाच्या तरुणाचा वडिलांसोबत किरकोळ वाद झाला होता. रागाच्या भरात तो घर सोडून निघाला आणि “आता मी आत्महत्या करणार” असं सांगून घरातून निघून गेला. थोड्या वेळाने वडिलांनी त्याला फोन केला असता तो शिरपूरजवळील तापी नदीकडे जात असल्याचं त्यांना समजलं. घाबरलेल्या त्याच्या वडीलांनी तातडीने पोलीस हवालदार अविनाश चंद्रा (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे) यांच्याशी संपर्क साधला. हवालदार चंद्रा यांनी लगेचच नरडाणा पोलीस स्टेशनमधील आपले सहकारी राकेश शिरसाठ यांना कळवले. शिरसाठ यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि हवालदार गवळी यांना माहिती दिली.
तिघेही लगेच तापी नदीच्या पुलाजवळ गेले आणि वाहनांची तपासणी सुरू केली. काही मिनिटांतच आमीन दिसला आणि पोलिसांनी त्याला थांबवून सुरक्षितपणे पोलीस स्टेशनला नेले. त्याच्या कुटुंबीयांना बोलावून त्याच्या समजुतीने संवाद साधत त्याला सुखरूप त्यांच्या हवाली करण्यात आले. आमीनच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, दोन भाऊ, अविवाहित बहीण, पत्नी, ८ वर्षाचा एक मुलगा आणि २ वर्षांची मुलगी आहे. त्यांचा आधार असलेला आमीन पोलिसांच्या सजगतेमुळे वाचला. या प्रसंगानंतर जिल्हा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हवालदार चंद्रा, शिरसाठ, उपनिरीक्षक सोनवणे आणि हवालदार गवळी यांच्या तत्परतेमुळे केवळ एक जीव नव्हे, तर एक संपूर्ण कुटुंब वाचले.