बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर संवेदनशीलतेने आणि कायदेशीर दृष्टिकोनातून प्रभावीपणे कारवाई व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन धुळे पोलीस मुख्यालयात करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये बाल न्याय (J.J. Act) आणि POCSO कायद्याच्या अंतर्गत सर्व संबंधित यंत्रणांना समर्पित प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश Child Welfare Police Officers (CWPOs) आणि Special Juvenile Police Units (SJPU) यांना बालकांच्या गुन्ह्यांचे संवेदनशीलतेने आणि कायदेशीर चौकटीत तपास करता यावा, यासाठी सजग करणे हा होता.
कार्यशाळेत बाल न्याय अधिनियम २०१५ (J.J. Act) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत पोलिसांची कायदेशीर, नैतिक आणि व्यावहारिक भूमिका अधोरेखित करण्यात आली. बालकांना सज्ञान आरोपींपासून वेगळे ठेवणे आणि त्यांना लॉकअपमध्ये न ठेवण्याचे बंधन तसेच ताब्यात घेतल्यावर २४ तासांत बाल न्याय मंडळासमोर हजर करणे अनिवार्य असल्याचेही सांगितले. पालक, नातेवाईक किंवा परिविक्षा अधिकाऱ्याला माहिती देणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत बालकाला हातकडी घालू नये. तसेच पालकांच्या ताब्यात देण्यासाठी बाल कल्याण समितीचा आदेश असणं आवश्यक असल्याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
वर्ष २०२२ ते २०२५ या कालावधीत जिल्ह्यात POCSO अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून आली आहे. उदा. विनयभंगाच्या घटनांमध्ये २०२२ मध्ये २१ तर २०२३ मध्ये ८८ प्रकरणे नोंदवली गेली. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण २०२३ मध्ये ७३ प्रकरणांपर्यंत पोहोचले. केवळ गुन्हेगारांवर कारवाई करणे नाही तर बालकांच्या हक्कांचे संरक्षण, शोषण रोखणे, बालविवाह आणि बालमजुरीविरोधात उपाययोजना करणे हीही पोलीस विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. पुनर्वसन, समुपदेशन, निरीक्षणगृहात देखभाल आणि पुनःसमावेशन प्रक्रियेतही पोलीस विभागाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे पोलिसांची भूमिका ही केवळ अंमलबजावणारी नसून, समाजाच्या आधारस्तंभ म्हणून बालकांना सुरक्षित व सन्मानजनक जीवन देणारी महत्त्वाची यंत्रणा आहे, हे अधोरेखित झाले. बालकांचे संरक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे आणि त्यात प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने योगदान देणे गरजेचे आहे, हा ठाम संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.
