वनमंत्री ना.गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक
धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील वनविभागातील लघु बंधार्यासह धुळे तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या सिमेंट बंधारे, पाझर तलाव, लघु पाटबंधारे प्रकल्पात किती प्रमाणात गाळ साठला आहे तसेच साठलेला गाळ शेतकर्यांना व वनीकरणासाठी कसा वापरता येईल? याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा अशी सूचना ना.गणेश नाईक वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकित दिली असल्याची माहिती माजी आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान धुळे तालुक्यातील पांझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला गती मिळणार असून त्यावर अवलंबून असलेल्या शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचेही माजी आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील वन विभागातील लघु बंधार्यासह तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील पाझर तलाव व सिमेंट बंधारे, लघु पाटबंधार्यातील गाळ काढणेबाबत आज दि.11 जून 2025 रोजी वन मंत्री ना. गणेश नाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृह,मलबार हिल,मुंबई येथे विशेष बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. माजी आ.कुणाल पाटील यांच्या मागणीनुसार सदर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, नरेश झुरमुरे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, रविकिरण गोवकर मुख्य वन सरंक्षक,उदय ढगे विशेष कार्य अधिकारी वन विभाग, गजेंद्र हिरे वन सरंक्षक धुळे, नितीन कुमार सिंग उपवन संरक्षक धुळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकित धुळे तालुक्यातील वनविभागातील हद्दतील असलेल्या पाझर तलाव, सिमेंट बंधारे, लघु पाटबंधार्यांमध्ये साठलेला गाळ काढण्याबाबत व तलावांची पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या पाझर तलाव व बंधार्यातील गाळ काढण्याची मागणी केली.
