अक्कलपाडा प्रकल्पातुन धुळे शहरासाठी 50 वर्षांकरिता जल आरक्षण
मुंबईतील बैठकीत पांझरा रिव्हर फ्रंटसह विविध मागण्यांवर कार्यवाहीची ग्वाही
धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी निवडून आल्यापासून विकासाचा धडाकाच लावला आहे. वेगवेगळ्या कामना मंजुरी मिळवत विकासाचे मनोरे रचतानाच धुळेकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पात 100 टक्के जलसाठा करण्यासह भविष्यातील गरज पाहता या प्रकल्पामध्ये धुळे शहरासाठी पुढील 50 वर्षांकरिता पाण्याचे आरक्षण करण्याची गरज आहे. शहरातून वाहणाऱ्या सुशी नाल्याच्या दोन्ही काठांवर रिटेनिंग वॉल बांधून नाल्याचे संवर्धन करणे, पांझरा रिव्हर फ्रंटअंतर्गत दोन्ही काठांवर विविध कामांसह सुशोभीकरण करणे, प्रकाशा- बुराई प्रकल्पातून मालनगाव धरणापर्यंत स्वतंत्र उदनलिका टाकून मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरणे, या आमदार अनुप अग्रवाल यांच्या आग्रही मागण्यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई येथील मंत्रालयात मंगळवारी (ता. 17) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध मागण्यांबाबत आढावा बैठक झाली. यात आमदार अग्रवाल यांनी पाच मागण्यांबाबत मंत्री महाजन यांच्याशी चर्चा करत या मागण्या मंजूर करण्याचे साकडे घातले. त्यावर मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार अग्रवाल यांनी केलेल्या मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार राम भदाणे, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अक्कलपाड्यात 50 वर्षांसाठी जलआरक्षण
आमदार अग्रवाल म्हणाले, की धुळे शहराला सध्या अक्कलपाडा प्रकल्पासह तापी योजना, नकाणे तलाव, डेडरगाव तलावातून पाणीपुरवठा होतो. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील 50 वर्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी अक्कलपाडा प्रकल्पात पुढील 50 वर्षांसाठी पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी केली. याबाबत मंत्री महाजन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सुशी नाल्याला रेटेनिंग वॉल बांधा
धुळे शहरातून वाहणाऱ्या सुशी नाल्याच्या दोन्ही काठांवर दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असून, पात्राची रुंदी कमी होत आहे. शिवाय या नाल्यात कचरा टाकण्यात येत असल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रामुळे पाणी तुंबून काठावरील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच पुरामुळे जीवित हानीचीही शक्यता आहे. यामुळे सुशी नाल्याचे संवर्धन करण्यासाठी नाल्याची स्वच्छता करावी, तसेच दोन्ही काठांवर रिटेनिंग वॉल बांधावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. यातून प्रदूषणास आळा बसण्यासह नाल्याचेही संवर्धन होईल. यावर मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
पांझरा रिव्हर फ्रंटच्या कामास निधी द्या
धुळे शहराच्या मध्य भागातून पांझरा नदी वाहते. अक्कलपाडा प्रकल्पातून नदीपात्रात वर्षातून दोन-तीन वेळा आवर्तने सोडली जातात. मात्र, शहरात कुठेच बंधारे नसल्याने हे पाणी वाहून जाते. यासाठी पांझरा रिव्हर फ्रंटअंतर्गत हे पाणी अडविण्यासाठी शहरात तीन बंधारे बांधणे आवश्यक आहे. हे बंधारे बांधल्यास शहरात पाणीपुरवठ्यास मोठी मदत होईल. तसेच पाणी अडविण्यासाठी नदीपात्राचे खोलीकरण करणे, नदीच्या दोन्ही काठांवर घाट बांधून सुशोभीकरण करणे, नदीतील जलपर्णी काढणे, स्काय वॉक बसविणे, महापालिकेचे गार्डन ते अग्रवाल भवनापर्यंत टॉय ट्रेन उभारणे आदी कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. यावर मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावाची पडताळणी करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मालनगावपर्यंत स्वतंत्र उदनलिका टाका
धुळे शहराला अक्कलपाडा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. शिवाय धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यांतील 90 गावांना पिण्यासाठी तसेच धुळे तालुक्यातील शेतीसाठी आवर्तने सोडली जातात. यामुळे प्रकल्पातील जलसाठा घटल्याने शहरात पाणीपुरवठ्यात अडचणी येतात. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पात 100 टक्के जलसाठा करावा, कान नदीवरील मालनगाव प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होण्यासाठी प्रकाशा- बुराई प्रकल्पातून स्वतंत्र उदनलिका टाकावी, जेणेकरून अक्कलपाडा प्रकल्पात मुबलक जलसाठा होऊन पिण्यासह शेतीसाठी पाणी देणे सोयीचे होईल. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही जलसंपदामंत्री महाजन यांनी आमदार अग्रवाल यांना दिली.
