प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिकेतर्फे शहरभर विशेष स्वच्छता मोहिमा आयोजित करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या कल्पकतेतून स्वच्छतेचा संदेश रंगरेषांद्वारे प्रभावीपणे उमटला आणि स्वच्छ भारताचे महत्व अधोरेखित झाले. आरोग्य विभागाचे महेंद्र ठाकरे यांनी सांगितले की, महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता तर निर्माण झालीच, पण समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी त्यांची सृजनशील शक्तीही उजळून निघाली.

