शिवसेना उबाठाने केला जोडे मारून धिक्कार
जळगाव येथे झालेल्या एका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री आणि शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
शेतकऱ्यांना “कर्जमाफीची सवय लागली आहे” असे म्हणत केलेल्या या वक्तव्याला बेजबाबदार आणि शेतकरीविरोधी ठरवत धुळे शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेने जोरदार निदर्शने केली.
झाशी राणी चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच, “शेतकरीविरोधी सरकार हाय हाय”, “बाबासाहेब पाटील माफी मागा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,
“महाराष्ट्राचा शेतकरी आधीच कर्जबाजारीपणामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त आहे. सरकारने मदत करणे दूरच, पण त्याच्याच विरोधात अशी बेताल वक्तव्य करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.”
या आंदोलनाद्वारे ठाकरे सेनेने सहकार मंत्री पाटील यांना तातडीने शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी केली असून, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

