धुळे देवपूर प्रभाग क्र. 2 मधील ओमशिवम नगर, भगवती कॉलनी आणि पांडव नगर परिसरातील नागरिकांना मागील काही काळापासून हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हितेश अग्रवाल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
बीबीसी हॉटेलजवळील हायवेवरील मोरी ही पाण्याने पूर्णपणे भरून गेली असून, हायवेला साईड गटारी नसल्याने पावसाचे व गटारीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरत आहे. त्यामुळे परिसरात चिखल, दुर्गंधी, मच्छर आणि रोगराईचे प्रमाण वाढले असून, बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साचलेल्या पाण्यामुळे राहदारी अडथळ्याची झाली असून, नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.परिसरात जिवाणूजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे सरचिटणीस राजेंद्र मुजगे, लोंढे, सुरेश पाटील (फौजी), मनोज पाटील, मनोज परदेशी, केतू पवार, राठोड सर, माळी काका व परिसरातील असंख्य नागरिकांनी या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करत निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नागरिकांची मागणी आहे की, संबंधित ठिकाणी त्वरित साईड गटारी बांधून पाण्याचा निचरा करण्यात यावा आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, जेणेकरून आजार आणि अस्वच्छतेपासून संरक्षण मिळू शकेल.
